Wednesday, March 1, 2017

शिवाजीराजे भाषण --

छत्रपती शिवाजी महाराज 
        नमस्कार,मि  .चि.-----------------------------------------------------इयत्ता-------- शाळा ----------------------------------------------------------
        यांचे वतीने 'श्री छत्रपती शिवाजी महाराज 'यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवनचरित्रावर थोडस वैचारिक मंथन करू इच्छित आहे. खरे तर आजच्या शिवजयंती उत्सवाच्या सुवर्ण दिनाला या थोर पुरुषाची किर्ती गावी असाच उत्सव आपण साजरा करतो आहोत. ज्या महापुरुषाने महाराष्ट्रातील रयतेला पारतंत्र्याची जाणीव करून दिली. हिंदवी स्वराज्य निर्माण करून खऱ्या अर्थाने रयतेस स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक पुरंदरप्रतापी, क्षत्रियकुलावंतांस राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माझं त्रिवार वंदन.
               मित्रांनो आजचं  व्यासपीठ आपल्या लाडक्या राजाची थोरवी सांगण्यासाठी आहे. माझ्या विध्यार्थीमित्रांनो ते दिवस फार धामधुमीचे होते. संपूर्ण महाराष्ट्रावर यवनांच राज्य होत. त्यांच्या धाकधडपशाहीने महाराष्ट्रातील रयत त्रासली होती. सततच्या लढाया, परकीय आक्रमणे, अन्याय-अत्याचार यातच अख्या महाराष्ट्रातील जनता भरडली जात होती. अहो महाराष्ट्रातील जनतेच्या नशिबी अठराविश्वे दारिद्रय जणू वाट्याला आलं होत. पण मित्रांनो अंधार कायमस्वरूपी राहत नसतो, ठराविक वेळ आली की तिमिरातुनी तेजाकडे नेणारा सूर्योदय निश्चितच होत असतो..  
                        भोसले घराण्यातील अनेक पराक्रमी पुरुषांपैकी थोर सरदार शहाजी राजे भोसले आणि त्याच्या वीर पत्नी जिजाबाई या दाम्पत्याच्या पोटी फाल्गुन वैद्य तृतीयेस म्हणजे १९ फेब्रुवारी १८३० ला एक तेजस्वी सुंदर बाळाने शिवनेरी किल्यांवर जन्म घेतला. मित्रांनो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावाजवळ आहे. शिवनेरी किल्यावर शिवाई देवीचं मंदिर म्हणून बाळाचे पाळण्यातील नाव शिवाजी ठेवण्यात आले.
                     शिवाजी आदिलशहा , निजामशहा,ओरंगजेब बादशहा यांना आपल्या पराक्रमाने काळजात धडकी भरवणारा त्यांच्या साम्राज्यास  सुरुंग लावून ते खिळखिळे करणारा आणि महाराष्ट्रातील रयतेला यवनांच्या जाचातून मुक्त करणारा रयतेचा वाली , हिंदवी स्वराज्याच स्वप्न उराशी होऊन एक धुरंदर असा रयतेचं भावी जाणता  राजा शिवनेरीवर जन्माला आला होता. मित्रांनो मूठभर मावळ्यांच्या गनिमी काव्यावर, युक्तीच्या कणभर नव्हे मनभर आत्मविश्वासाच्या बळावर माँ साहेब जिजाऊ आणि तुळजाभवानी या दोन आदिशक्तीनिंच्या आशिर्वादाने स्वराज्य निर्माण करण्याचं दिव्य कार्य करणाऱ्या महापराक्रमी, परमप्रतापी अशा तेजस्वी महापुरुषाची जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत. 
                शिवाजींचे बालपण सहा-सात वर्षे धावपळीचे गेले. त्यांची आई जिजाबाई शिवाजीमहाराजांना भीमाच्या व कृष्णाच्या गोष्टी सांगत असे. साधु-संतांच्या गोष्टही त्यांच्या मनात आदरवाचक निर्माण झाल्या शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्र विद्या ग्रहण करत होते. वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजींनी विविध कला व विद्या यांचे ज्ञान प्राप्त केले. 
                मित्रांनो जिजाऊने शिवाजीमहाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा? शत्रूशी युद्ध कसे    करावे? किल्ले कसे बांधावे? घोडे-हत्ती यांची परीक्षा कशी करावी? शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे? हे उत्तम प्रकारे शिकवले. 
              आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याठी  छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य चातुर्य संघटन कौशल्य व पराक्रम अशा राजास व सत्त्वगुणांचे बाळकडू देण्याचे महान कार्य थोर माता जिजाऊंनी केलं. 
म्हणूनच म्हणतात -                 
                    ''पुत्र असावा ऐसा गुंडा 
                    असावा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा''     (२  वेळा) 
जसे आपले शिवाजी राजे घडले, वाढले आणि कीर्तिवंत झाले. 
मित्रांनो , श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना   
    स्वतःच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांना निभावून नेले. आदिलशाही दरबारात पोलादी ताकदीचा, धिप्पाड देहाचा आणि तितकाच कपट  कारस्थान करणारा , कावेबाज सरदार. त्याच नाव अफजलखान. छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत कैद करून अथवा ठार मारून संपूर्ण स्वराज्य नष्ठ करण्याचा विडा त्याने भर दरबारात उचलला होता. पण मित्रांनो राजांनी आपल्या स्वराज्यावर घोंघावत असलेल्या अफजलखान नावाच्या वादळाशी सामना केला. राजांनीं खानाचा वध  करून त्याच स्वप्न धुळीस मिळवले आणि आमच्या महाराजांची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रभर पसरली. परकीय सत्ताधीशांना ,परकीय आक्रमणांना चांगलाच जबर वचक या प्रतापगडच्या पराक्रमातून बसला.
                   मित्रांनो, सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका असे कितीतरी पराक्रम महाराजांनी गाजवले प्रतापगडावरील पराक्रमाच्या प्रसंगावरून   
           मला इथं एवढच म्हणावसं वाटत -               
'' वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजिती दात, हि जात मराठ्याची . 
अहो नव्हतीच घाबरणार खानाच्या बापाला ही  संतान थोर महाराष्ट्राची'' (२ वेळा)
                    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्ठीबरोबर रयतेसाठी शेतसारा माफ करणे, शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे देणे, परिसरामध्ये असलेली झाडे जपणे, पावसाचे पाणी अडवणे, साठवणूक करून ते टंचाईच्या काळात वापरणे, रयतेवर कोणाकडूनही अन्याय न होऊन देणे, अशा अनेक लोककल्याणकारी कामांसाठी राजांनी आपल्या अष्ठप्रधानमंडळाच्या रूपाने एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली होती. त्यातून त्यांनी पारदर्शक आणि लोककल्याणकारी स्वराज्याची उत्तम    घडी बसवली होती . अशा प्रजाहितदक्ष रयतेचा जाणता राजा जो होऊन गेला आणि असा जाणता राजा पुन्हा या महाराष्ट्रभूमीत भविष्यात आलाच तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असतील. 
      ''न भूतो न भविष्यती '' महाराजांच्या जन्मदिनी त्याच्या प्रतिमेस आदरपूर्वक वंदन करताना व्यक्त होताना मला एवढच म्हणावसं वाटत                          शिवरायांचं आठवावा तो प्रताप 
                      शिवरायांचे आठवावे ते रूप !
                             भूमंडळी बोला-  
                हिंदवी स्वराज्यसंस्थापक, गो-ब्राम्हण, प्रतिपालक , पुरंदरप्रतापी , सिंहासनाधीश,क्षत्रिय कुलावतांस ,राजाधिराज 
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ------------------------------विजय  असो 
 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ------------------------------विजय  असो 

धन्यवाद ! 






















































     

0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment